रविवारी होणार वितरण सोहळा..
चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम गायकवाड यांच्यासह सुमती जोशी यांचा होणार सन्मान
सोलापूर : लोकमंगल समूहाततर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीत हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली.
लोकमंगलच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. संग्राम गायकवाड यांच्या “मनसमझावन ” या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्या “चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे” या आत्मपर लेखनाला तर ” गोल्पे विभोर गल्पेर बागान” बाणी बसू यांच्या बंगाली कथा संग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहॆ. मराठी भाषा वाङमय संस्थात्मक योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहॆ. यावेळी सोलापुरातील सुनिता डागा यांच्या “हजार मैलावर तुझे शहर” या कविता संग्रहास पुरस्कार जाहीर करण्यात आला आहॆ. रोख 11 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस शोभा बोल्ली,
शिरीष देखणे,नितीन वैद्य, विजय साळुंखे, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चौकट
आ. सुभाष देशमुख यांच्याकडून
कृषी भूषण पुरस्कार देण्याची घोषणा
या पत्रकार परिषदेत आ. सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकमंगलतर्फे हा नवा पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. दि. 1 जुलै रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे आ. देशमुख यांनी जाहीर केले.